१७ मार्च, २०२५

गुप्तहेर सत्यवीर आणि भूतबंगल्याचे रहस्य - भाग 4

 



सकाळी सत्यवीर झोपेतून उठला आणि लाडकी बाजेवर तसच आळसावलेल अंग टाकून तो उगाच पडून राहिला. हरिभाऊंच्या घराजवळच एक छोटी चूल होती त्यावर हंडा ठेवून हरिभाऊ पाणी गरम करत होते आणि खांद्यावरील पंचाने गरम हंड्याला लावून तो गरम झालेला पंचा डोक्याला लावत होते. म्हणजेच डोक्यावरील टेंगळाला शेक देत होते. त्यांना तसं करताना पाहून सत्यवीरला कालचा प्रसंग आठवला आणि हसू आवरलं नाही. हात तोंडावर धरून हरिभाऊंना ऐकू येऊ नये म्हणून खुसपुसत हसू लागला. पण त्याच्या खुसपूस करत हसण्याचा आवाज हरिभाऊंना आलाच.

“हस बाबा हस आमच्या वेंधळेपणावर..” गंभीर आवाजात मागे वळून न पाहता आपल्या कपाळाला पंचाने  शेक देत हरिभाऊ म्हणाले. सत्यवीर बाजेवरून उठत हरिभाऊंच्या शेजारी जाऊन बसला.

“माफ करा हरिभाऊ...पण कालचा प्रसंग आठवून हसल्यावाचून राहवलं नाही” सत्यवीर हसतच म्हणाला.

“भूतबंगल्यात गेल्यावर अशीच अवस्था होणार ना” अशी प्रतिक्रिया देऊन हरिभाऊंनी आपल्या कपाळावरील टेंगळाला शेक देणे चालूच ठेवले.

“मला तर तिथे एकाही भुताचा किंवा कोणत्या भूतसदृश विचित्र गोष्टींचा वास आला नाही.” चुलीपुढे हात शेकत सत्यवीर चवड्यावर बसला होता.

“पण वातावरण किती भयानक आणि स्मशानशांततेसारखे होतं तिथे” बंगल्याची आठवण काढताच हारीभाऊना हुडहुडी भरली होती.

“आजूबाजूला माणसांचा जास्त वावर नसल्यामुळे तसं वाटणं साहजिक आहे. पण मला तर तिथे वेगळेच काहीतरी जाणवले. असं वाटत होतं कि तिथे कोणीतरी चोरून लपून राहतंय” सत्यवीर म्हणाला.

“कसं काय?” हरिभाऊंनी विचारलं.

“जवळपास प्रत्येक खोलीत भिंतींवर चरे पडलेले होते ते मुद्दाम कोणीतरी पाडलेले वाटतात. जमिनीवर खोदलेले खड्डे माणसांनी खोद्ल्यासारखे वाटत होते बांधकाम करताना असे खड्डे कोणी घरात पाडत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंगल्याच्या सगळ्यात आतल्या मोठ्या खोलीत जिथे लोखंडी कपाटे ठेववलेली आहेत तिथे एका टेबलाखाली हाडे पडलेली होती. एकदम छोटी छोटी हाडे होती. कदाचित कोंबडीच्या पायांची असावीत. चिकन खालून उर्वरित हाडे तिथे कोणीतरी टाकलेली असावीत. कापडाची बोचकी आढळली ज्यामध्ये कापडांचे तुकडे होते. ती कापडं अंगा खांद्याला गुंडाळून खिडकीत उभं राहिल्यास रात्रीत लांबून चित्रविचित्र आकार दिसत असावेत.” सत्यवीरने हरिभाऊंना माहिती पुरवली.

म्हणजे आतमध्ये कोणीतरी गुपचूप राहतंय आणि भुताचे आवाज काढतंय जेणेकरून लोक घाबरावेत” हरिभाऊ डोळे बारीक करत बोलले.

“निश्चितपणे, वरची पाहणी करून जिन्यावरून खाली येताना नेमके तुम्ही बाहेरून खाली हॉलमधे येत होतात. तुमच्या कातडी चपलेचा वाळूवर येणार कर्रकर्र आवाज ऐकल्यावर मला वाटलं कि इथे जे कोणी गुपचूप राहतंय ती व्यक्तीचं आली असणार म्हणून सावध होऊन मी पुढची पावले उचलली”  सत्यवीर जागेवरून उठत म्हणाला.

“बापरे..मग जर असं असेल तर आपल्याला लगेच शेंडे साहेबांना सांगावं लागेल. ते उगाचच भुताचा धसका घेऊन घाबरू लागले” हरिभाऊ सुद्धा जागेवरून उठत उभा राहिले.

“हो ते तर करूच. पण हे असं गुपचुप पणे तिथे कोण राहतंय याचा छडा लावायला हवा. त्यासाठी रात्री गुपचूप बंगल्याच्या आवारात जाऊन दबा धरून पाहायला हवं कि आतमध्ये कोण राहतंय” गंभीर आवाजात सत्यवीर म्हणाला.

यावर हरिभाऊ काहीच बोलले नाही पण एक गोष्ट तर समजली होती कि कोणीतरी लोकांच्या नकळत तिथे वावरतंय. पण ते कोण असावं याचा शोध घेणे क्रमप्राप्त होतं. सत्यवीरने झटपट अंघोळ वगेरे उरकली आणि शेंडेंच्या गावातल्या घराकडे जायला निघाला. हरिभाऊंना उगाचच काल दमछाक झाल्याने त्यांना आराम करायला घरातच थांबा असं त्याने सांगितलं आणि एकटाच तो गावातून निघाला. कच्चा रस्ता तुडवून गावातून इकडे तिकडे निरीक्षण करत तो शेंडेंच्या घरापाशी पोहला. गेटबाहेर एक मोठी चारचाकी उभी होती. गाडीकडे पाहतच गेट उघडून तो आतमध्ये आला. नोकरचाकर झाडांना पाणी घालण्याचं आणि वाळलेल्या पानांचा पालापाचोळा गोळा करण्याचं काम करत होते. सत्यवीरला पाहून त्यांनी ओळखलं कि हा काल हरिभाऊंसोबत आलेला त्यांचा पाहुणा आहे म्हणून कोणीही त्याला हटकल नाही. मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये येऊन तो तडक शेंडेंच्या ऑफिसच्या कामाच्या खोलीकडे निघाला. ऑफिसच्या खोलीचा दरवाजा उघडाच होता. आतमधून जरा मोठ्याने बोलण्याचा आवाज येत होता.

“अहो मी आधीच सांगितलंय ना तुम्हाला. मला नाही विकायची माझी मालमत्ता. सध्या माझा तसा कोणताही विचार नाहीये” शेंडेंचा आवाज आला.

“हे बघा मिस्टर शेंडे, आजच्या घडीला जो भाव मिळतोय उद्या त्यापेक्षा जास्त भाव उद्या मिळणार नाहीये. तेव्हा माझं ऐका आणि हट्ट सोडा” एक मधाळ आवाज आतून आला.

सत्यवीर दरवाजाच्याजवळ येऊन उभा राहिला. आतून शेंडेच लक्ष बाहेर उभ्या असलेल्या सत्यवीरकडे गेलं.

“अरे सत्यवीर, या या आत या ...” शेंडेनी हसतमुखाने सत्यवीरला आतमध्ये बोलावलं.

सत्यवीर आतमध्ये येऊन बाजूच्या सोफ्यावर बसला. शेंडे साहेबांसमोर एक मध्यम वयाची बाई बसली होती. तिची केशरचना खूपच आधुनिक प्रकारची होती तसेच कपडे सुद्धा आधुनिक होते. तिने सोफ्यावर बसलेल्या सत्यवीरकडे एक कटाक्ष टाकला. ती एक आत्मविश्वासू बाई असल्याचं सत्यवीरला जाणवलं. तो काहीही न बोलता शांतपणे बसला.

“ठीक आहे मिस शीला, तुम्ही आता येऊ शकता. माझ्याकडे आता पाहुणे आलेले आहेत” शेंडे त्या बाईला म्हणाले.

तसं ती बाई खुर्चीवरून उठली आणि सत्यवीरकडे परत एक कटाक्ष टाकून चालत दरवाजाजवळ गेली आणि म्हणाली “बघा नीट विचार करा परत”

“या तुम्ही मिस शीला” हाताने इशारा करत जरासं भाषेवर जोर देत शेंडे म्हणाले. त्यावर ती बाई काहीही न बोलता बाहेर निघून गेली.

“बोला सत्यवीर काय म्हणताय” टेबलावरील फाईल बाजूला ठेवत शेंडे सत्यवीरला म्हणले.

“तुम्हाला एक चांगली बातमी द्यायला आलोय मी” सत्यवीरने शेडेंना सांगितलं.

यावर शेंडेचा चेहरा जरा फुलला. “काय सांगताय काय. कोणती बातमी? बंगल्याच्या प्रकरणाचा छडा लावलात कि काय ” दोन्ही हात टेबलवर ठेवत शेंडे म्हणाले.

“अगदीच तसं नाही पण तुमच्या बंगल्यावर तपासासाठी गेलो होतो. तिथे मला भूत नावाचा प्रकार मला तरी जाणवला नाही” असं म्हणत सत्यवीरने कालच्या बंगल्यावरील निरीक्षणाची संपूर्ण माहिती शेंडे साहेंबांना दिली. मिळालेली हाडे, कापडाची बोचकी. हरिभाऊंच्या आणि त्याच्या गैरसमजातून जो प्रकार घडला तो देखील सांगितला.

“अरे वाहः हे तर मस्तच झालं. म्हणजे भूतबित असलं काही नाहीये तर तिथे” आनंदाने चेकाळत शेंडे बोलले.

“निश्चीत नाहीये. भुतांच्या बाबतीत बिनघोर राहा. पण भुतांच्या नावाखाली दुसरं कोण तिथं गुपचूप राहून उच्छाद घालतंय हे मात्र शोधावं लागणार आहे. तसचं जे कोणी भूतबंगल्यात राहत आहे त्यानेच तुमच्या घरात गुपचुपपणे शिरून वस्तूंची फेकाफेक आणि रक्ताने मजकूर लिहिला असण्याची शक्यात आहे. ”असं सांगत शेंडेच्या घरातील केलेली निरीक्षणे आणि घरात आडमार्गाने बाहेरून कुठून येता येऊ शकत ते सत्यवीरने शेंडेंना सांगितली.

“अहो ते तुम्ही शोधून काढालच हो. पण भुतांच्या तावडीतून मी सुटलो याचा आनंद जास्त झाला बघा छान बातमी आणलीत तुम्ही” शेंडे आनंदात होते.

“तुमचा कोणावर संशय आहे का? म्हणजे कोणी हितशत्रू किंवा इतर कोणी” सत्यवीरने विचारलं.

“संशय तसा कोणावर घेणार ना. हे असले प्रकार कोण करेल माहित नाही आणि मुळातच माझा स्वभाव मितभाषी असल्याने शत्रू कोणी असतील असं वाटत नाही” शेंडे बोलले.

ते दोघे बोलत असतानाच एक चष्मा घातलेला एक तरुण आतमधे आला. त्याच्या हातात फाईलचा गठ्ठा होता.

“ती नालायक बाई परत आली होती ना? तिला एकदा सांगितलेलं कळतच नाही वाटत. बाहेर गेटवर भेटली. म्हणत होती कि साहेबांना समजावून सांग. तर मी म्हटल कि साहेबांना तो बंगला विकायचा नसताना कशाला त्यांना भरीस पाडताय आणि हेलपाटे घालताय सारखे” तावातावाने तो तरुण बोलत होता.

त्या तरुणाच्या या वाक्याने शेंडे आणि सत्यवीरने मान त्याच्याकडे वळवली. एक चष्मा घातलेला मिशीवाला तरुण रागारागात तिथे आला होता.

“अरे हो हो अनमोल.. शांत हो. खाली बस बर आधी. त्या बाईचं सोडून देत. त्याचं कामाचं आहे ते” शेंडे त्याला शांत करत म्हणाले.

शेंडेनी त्याला शांत बसायला सांगितल्यावर तो खुर्चीत बसला. सोफ्यावर बसलेल्या सत्यवीरकडे भुवया ताणत तो पाहत होता.

अनमोलची ती नजर पाहून सत्यवीरकडे हात करत शेंडे बोलले “हे आहेत..” असं बोलून शेंडे जरा थांबले. त्यांना सत्यवीरची ओळख करून द्यायची होती. पण ती काय करून द्यावी असा विचार करत ते थोडं थांबले. कारण आपण गुप्तहेर म्हणून इथे तपास करायला आलोय हे सांगायला सत्यवीरने मनाई केली होती.

“हे आपले..हरिभाऊ आहेत ना..त्यांच्याकडे आले आहेत. हरिभाऊ शहरात असताना त्यांचे एक ख्रिचन स्नेही होते त्यांचाच हा मुलगा सत्यवीर याचं नाव. शेंडेनी सत्यवीर व्यवस्थित ओळख करून दिली.

“आणि सत्यवीर, याचं नाव अनमोल. आमच्या पतपेढीवर क्लार्क म्हणून आहे. भरपूर मेहनती आहे.

तसं त्या तरुणाने अनमोलने हात पुढे केला. सत्यवीरने देखील हसत त्याचाशी हस्तांदोलन केलं.

“साहेब त्या बाईला वेळीच आवर घालायला हवा नाहीतर तिच्या सारखे अजून काही प्रॉपर्टी एजन्ट इथे घिरट्या घालू लागतील” अनमोल शेंडेकडे वळत म्हणाला.

 “अरे अनमोल कोणीही येणार नही. हि मिस शीला फक्त महत्वाकांक्षी आहे म्हणून सारखी येतेय. बाकी इतरांना माहितीये आपण बंगला विकणार नाहीये म्हणून इथे कोणीही येणार नाही’ शेंडे आरामात खुर्चीत रेलत म्हणाले.

अनमोलच्या बोलण्यावरून सत्यवीरला एक समजलं होतं कि तो इथे येण्यापूर्वी जी बाई बसली होती ती एक प्रॉपर्टी एजन्ट असून तिचं नाव मिस शीला आहे. तिची अजून माहिती काढण्याकरिता सत्यवीर पुढे विषय वाढवत म्हणाला. “नक्की कोण होत्या या बाई. इतर कोणीही रस घेत नसताना त्याच फक्त एवढ्या का मागे लागल्यात बंगला विकत घेण्याच्या”

“अहो काय सांगू तुम्हाला सत्यवीर, ती एक निर्ढावलेली एजंट आहे. जुन्या किंवा वादातल्या मालमत्ता विकत घेऊन परत त्या मोठ्या भावात लोकांना विकायच्या हाच व्यवसाय आहे तिचा” अनमोलने माहिती पुरवली.

“हो.. तिचे वडील आधी हा व्यवसाय करायचे. त्यांच्या माघारी आता हि बाई त्यांचा व्यवसाय सांभाळते.” शेंडेनी पुढची माहिती दिली.

“पण त्या बंगल्यात तर भुते आहेत ना. अशा भुतांनी पछाडलेल्या बंगल्याल्या विकत घेऊन नंतर कोणाला विकणार त्या” सत्यवीरने मुद्दाम अनमोलसमोर आपली शंका उपस्थित केली.

“भुतांच्या नावाखाली इतर कोणीहि ती मालमत्ता घेणार नाही म्हणून स्वस्तात प्रॉपर्टी विकत घेऊन नंतर त्या पाडून त्यावर एखादी व्यावसाईक इमारत किंवा हॉटेल्स बांधून नफा मिळवायचा हा प्लान असतो या लोकांचा” अनमोलने चष्मा सावरत म्हणाला.

“अच्छा असं आहे तर” एवढ बोलून सत्यवीर शांत बसला.

“चला मी निघतो आता. फाइल्स द्यायला आलो होतो फक्त” असं म्हणून अनमोल जागेवरून उठत म्हणाला.

“मी सुद्धा निघतो. साहेबांना भेटायला आलो होतो सहजच” हसत हसत सत्यवीर म्हणाला आणि अनमोल सोबत बोलून या मिस शिलाची अजून माहिती घ्यावी म्हणून तिथून निघाला. शेंडेंचा निरोप घेऊन दोघेही सोबतच घराबाहेर बाहेर पडले आणि गेटमधून बाहेर पडून सोबत जाऊ लागले.

सत्यवीर तुम्ही कामधंदा काय करता” अनमोलने विचारलं.

“मी काही विशेष नाही. असचं हाताला येईल ते काम करत असतो. तुम्ही कधीपासून आहात शेंडे साहेबांकडे” सत्यवीर म्हणाला.

“मी काही महिने झाले त्यांच्याकडे काम करतोय. कोणाचा आगापिछा नसताना इथे काम शोधत आलो होतो. लोकांनी शेंडे साहेबांचं नाव सुचवलं. मग त्यांच्याकडे काम मागायला गेल्यावर त्या सद्गृहस्थाने काम दिलं. माझ्यावर खरोखरच उपकारच केले बघा त्यांनी” अनमोल भावूक होऊन म्हणाला.

“हो हो खरंय.. शेंडे साहेब मनाने तसे भावनाशील आहेतच. पण भूतांचा खूपच धसका घेतलाय त्यांनी. लोकं इथे गावात चर्चा करताना ऐकलं मी” सत्यवीरने मुद्दाम विषय छेडला.

“हो हेही खरंय, पण त्यांच्या याच भावूक स्वभावाचा लोकं गैरफायदा घेतात. जसं कि मेहतांनी घेतला” अनमोलने जरा घुश्यातच सांगितलं.

“मेहता म्हणजे कोण?” बंगल्याच्या आधीच्या मालकाबद्दल अनमोलकडून अधिक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने सत्यवीरने अजाणतेपणाचा आव आणत विचारलं.

“आधी ती जागा मेहता नावाच्या एका माणसाची होती. शेंडेसाहेबाचं आणि त्याचं चांगलंच जमायचं. नंतर त्यांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू त्या घरात झाला. मेहता कुटुंबियांना ते घर सोडून जावं लागलं. पण जाताना इथे कशाला मालमत्ता ठेवायची म्हणून भावनिक होऊन मेह्तांनीच शेंडेना गळ घातली आणि त्यांना जागा विकत घ्यायला लावली. शेंडेनी सुद्धा ती बंगला असलेली जागा विकत घेतली आणि अडकले” अनमोलने खाली मान घालत सांगितलं.

“ओहो किती नुकसान झालं त्यांचं आणि आता तर ती मालमत्ता घ्यायला एजन्ट लोकांच पेवच फुटलं असेल नाही सत्यवीरने त्याच्या पाठोपाठ सुस्कारा सोडला.

“ आधी झालं तसं. पण शेंडेनी कोणाला भिक घातली नाही. एवढी महागातली मालमत्ता स्वस्तात कोण देईल हो. पण हि मिस शीला हि काही पिच्छा सोडेना साहेबांचा” रागातच अनमोल म्हणाला.

“या मिस शीला यांनी या मालमत्तेत जरा जास्तच लक्ष घातलं आहे” सत्यवीरने विचारलं.

“हाडाची प्रॉपर्टी एजन्ट आहे ती बया. अशा बऱ्याच वादातल्या मालमत्ता तिने स्वस्तात घेऊन लोकांना विकल्यात”

“हि भूतबंगला असलेली प्रॉपर्टी मिळाली तर तिच्या फायद्याचा सौदा ठरणार आहे तर” सत्यवीर म्हणाला.

अनमोलने यावर फक्त मान डोलावली.

“खूपच वाईट हो.. बिचाऱ्या साहेबांना किती मनस्ताप होत असेलसत्यवीरने माहिती काढण्याच्या उद्देशाने विचारलं.

“मी अजून गेलो नाही तिथे त्यामुळे मला सांगता येणार नाही पण लोकं बऱ्याच गोष्टी सांगत असतात. त्यांना दुसरी कामेच काय आहेत ” अनमोलने सांगितल.

चालत चालत दोघेही पुढे नानांच्या घरापुढून जात असतानाच घराच्या दरवाजातूनच नानांनी आवाज दिला

“काय अनमोल कुठे फिरताय पाहुण्यांना घेऊन” आवाज येताच दोघेही थांबले.

“काही नाही असचं फिरतोय कपाळावर आठ्या देत अनमोल म्हणाला. ‘आता हा उपटसुंभ उगाचच वेळ खाईल’ असं पुटपुटत अनमोल पुढे चालू लागला.

“थांब कि जरा चहा घेऊन जा” नानांनी नेहमीप्रमाणे आपली टकळी चालू केली.

“नाही मला काम आहे” असं अनमोल म्हणाला.

सत्यवीर मात्र नानांशी थोडं बोलायचं म्हणून थांबला. पण अनमोल मात्र कामाचा बहाणा करून तिथून निसटून गेला. नानाच्या घराजवळ जात सत्यवीर बोलला- काय म्हणता नाना”.

“काही नाही बघ आराम. काय म्हणतायत तुमचे शेंडे साहेब, काही काम दिलं कि नाही त्यांनी” माहिती काढण्याच्या आपल्या नेहमीच्या स्वभावात नानांनी विचारलं.

“नाही तिथे एक बाई आली होती तिच्यासोबत बोलत होते फक्तसत्यवीरने आगाऊपणाने माहिती दिली.

“काय म्हणतोस बाई..” बाई हा शब्द ऐकताच नानांच्या चेहऱ्याचा नूर बदलला. हे ओळखून सत्यवीरने त्यांना तुम्ही समजताय तशी बाई नाही तर बंगल्याच्या संदर्भात बोलायला ती आली असल्याचं सांगितलं.

“मग ती मिस शीला असेल. मालमत्ता खरेदी विक्रीची कामे करते. कोणी घेत नसलेल्या किंवा वादातल्या मालमत्ता घेणे हा तिचा हातखंडा आहे” नाना बोलले.

“शेंडेंच्या भूतबंगल्यात भारीच रस दिसतोय तिला” सत्यवीर म्हणाला

“असणारच.. तो बंगला कोणी घेणार नाही म्हणून स्वस्तात मिळणार ना तिला” नाना पोट खाजवत म्हणाले.

“पण बंगल्यात तर भुते आहेत ना” सत्यवीर उगाचच घाबरत बोलला.

“भुते आहेत असं लोकं म्हणतायत. आत जाऊन कोणी पाहिलंय तेव्हा“ नाना म्हणाले.

“तुम्हाला काय वाटतं भुते खरच असतील तिथे” सत्यवीरने साळसूदपणे विचारलं.

“मला नाही वाटतं. लोक उगाच रात्रीत झाडाच्या काळ्या सावल्यांना भुते म्हणत असावीत.” नाना बोलले.

“मग तुम्ही बंगल्यात जाऊन भुते आहेत वा नाहीत याचा शोध घेऊन लोकांना का नाही सांगतसत्यवीर म्हणाला.

“छे छे .. मी कशाला जाऊ तिथे, मला काय दुसरी कामे नाहीत” अंग झटकत नाना बोलले.

“मग बंगल्यात मेहतांची मुलगी अवनी हिच भूत दिसतं असं लोकं का म्हणतायत” सत्यवीर म्हणाला.

“लोकं मुद्दाम अफवा पसरवतात रे. या कानाच त्या कानाला लागून. ती शीलाच मालमत्ता स्वस्तात मिळवण्याच्या हेतूने मुद्दाम लोकांमध्ये अशा अफवा पसरत असावी” नाना भुवई उडवत म्हणाले.

या नानांच्या तर्कावर मात्र सत्यवीर विचारात पडला. मालमत्ता काबीज करणाच्या अट्टाहासापोटी मिस शीला या गोष्टी करू शकते. त्यात तिचा भरपूर फायदा आहे. कि दुसरीच कोणती तरी व्यक्ती यामागे असू शकेल. जी पडद्यामागे राहून कोणाला तरी हाताशी धरून या गोष्टी करतेय. पण शेंडे मात्र बंगला स्वस्तात न विकण्यावर ठाम आहेत. जो कोणी भुताच्या नावाखाली बंगल्यात रात्री अपरात्री वावरतोय त्याला शेंडेंनी वा इतर कोणीही या बंगल्यात राहायला येऊ नये असं वाटतंय. पण असं करण्यामागे त्याचा हेतू काय असावा? मिस शीलाचा यामध्ये हात असू शकेल का? सत्यवीर मनातल्या मनात विचार करू लागला. नक्की बंगल्यात किती जण रात्री वावरतात याचं देखील गणित कळत नाहीये. कधी लोकांना बंगल्यात विचित्र आवाजात ऐकायला येतात तर कोणाला बाई दिसते. हे नक्की प्रकार तरी काय आहे. कारण ज्या कोणी व्यक्ती यामागे आहेत त्यांचा हेतू निश्चितपणे निर्भेळ नाहीये. इथे काहीतरी वेगळीच डाळ तिथे शिजतेय असं राहून राहून सत्यवीरला वाटू लागलं होतं.

क्रमशः


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Fell free to share your Feedbacks

चाहूल

  दरवाजाच्या फ़टीतून डोळे लावून ती बाहेर पाहत होती. अंधार पडायला सुरुवात झालेली होती. जसजसा अंधार वाढत होता . तशी तिच्या जीवाची घालमेल देखील...